सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण

News By - Sahyadri_News
सहयाद्री न्युज स्टार ११
केळघर / नारायण जाधव .
छत्रपती शिवाजी महाराजांनी नीलकंठ हरेश्वर मंदिर रायगड किल्ल्याच्या टकमक टोकाच्या खालील बाजूस बांधले होते, याची माहिती अनेक इतिहास संशोधकांकडून रायगड जिल्हा मराठा महासंघाच्या अध्यक्षा कुमुदिनी चव्हाण यांनी संग्रहित केली. या मंदिराचा शोध घेत त्या रायगड वाडीच्या हरेश्वर मंदिरापर्यंत पोहचल्या. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या शिव मंदिराची दुरावस्था पाहून दुःख झाले. मंदिरातील शिवलिंग दुभागलेले आहे. बाजूचा चौथारा अस्तव्यस्त झाला आहे. मंदिराचे खांब विखुरले गेले आहेत.
शिव मंदिराच्या दुरावस्थेला उदासीन शासन व पुरातत्व विभाग जबाबदार आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या मंदिराचे वैभव पुन्हा उभे राहावे, या मंदिराचा इतिहास जनतेसमोर यावा याकरिता सरकारने लवकरात लवकर हे मंदिर उभारावे असे निवेदन पुरातत्त्व विभागाला चव्हाण यांच्याकडून देण्यात आले आहे. शासन व पुरातत्त्व विभागाला मंदिर बांधणे होत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या अशी मागणी कुमुदिनी चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.










